केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. जवळपास २० ते २५ जणांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. त्यामुळे राजीनाम्याचे सत्र सुरू झाले असून राज्यातून रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता आहे. तर ८ -१२ जणांची मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. रावसाहेब दानवे यांचा दोनवेळा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यांच्याबरोबर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याही राज्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी बैठक घेतल्यानंतर मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली आहे. आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. ज्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे त्या सर्वांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाच्या वतीने दूरध्वनी करण्यात आला आहे. यापैकी अनेक जण मंगळवारी रात्रीच दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात जवळपास २० ते २५ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असून यासाठी सर्व ती तयारी करण्यात आलेली आहे. यावेळी १२ पेक्षा जास्त मंत्र्यांचा विभाग बदलण्याची शक्यता असून यामध्ये अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून ८ ते १० मंत्र्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होण्याची शक्यता असून जवळपास ६ पेक्षा जास्त कॅबिनेट मंत्र्यांची उचलबांगडी होणार असल्याची सूत्रांनी ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये २० पेक्षा जास्त नवीन चेहरे असल्याचे संकेत राजकीय सूत्रांनी दिले असून केंद्रीय मंत्रिमंडळाचा तरुण चेहरा आणि निवडणूक होवू घातलेल्या राज्यांना जादा प्रतिनिधित्वचे सूत्र नरेंद्र मोदी यांनी आखले असल्याची माहिती पुढे आली आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य